Satish Khade

पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

भारता सारखे जगात क्वचितच असे भूभाग आहेत की जिथे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे अन्यथा इतर सर्व भूभागावर  वर्षभरात कधी ही पाऊस पडतो. आपल्याकडे कळकळणार्‍या उन्हाळ्यात सर्व सृष्टीला ओढ लागते ती पावसाची. नवनिर्मितीच्या उर्मी सृष्टीतील सर्वांच्याच  उभारुन येतात पावसाळ्यात ! आज हवामानशास्त्र बरच प्रगत झालय. पण कालपरवा पर्यंत पारंपारीक ज्ञानावरच पाऊस येण्याचे, जास्त कमी येण्याचे वा न येण्याविषयीचे ठोकताळे निसर्ग निरीक्षणातून विकसित झालेले होते त्यांचाच संदर्भ घेतला जायचा. झाडं,प्राणी,पक्षी,किटक यांच्या वागवणूकीवर आधारीत हे ठोकताळे असून शेकडो वर्षे त्याचा प्रत्यय ही येत आहे कारण अति नियमीत असलेलं ऋतूचक्र! हे  पारंपारीक ज्ञान आपल्या समोर मांडण्यासाठी आजचा लेखप्रपंच!

 

ही निरीक्षणे लोकांची असून जंगलवाचन ,निसर्गवाचन करणार्‍या मारुती चितमपल्ली व त्यांच्या सारख्या जंगलात व निसर्गात राहणार्‍या तज्ञांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

 

 

 

पक्षांकडून मिळणारे संकेत:

 

 

    चातक पक्षी – पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात.पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते.जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार,ही काळ्या दगडावरची रेघ.त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

 

 

     पावशा पक्षी – चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

 

        तित्तीर पक्षी – माळरानावर,शेतांवर काळ्या-पांढऱ्या,अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको कोडय़ान केको’अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे.जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही.परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

 

     कावळा – कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ,सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा,करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे.कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार.पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार.दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार.आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही.आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते.यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

 

 

यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे कावळे,सारस,टिटवी आणि अशा बरेच पक्षांनी या विणीच्या हंगामात किती  अंडी  घातली,यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जातो.. तीन चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो.दोन अंडी दिली तर कमी पाऊस.एकच अंडे दिले वा अंडीच घातली नाही तर अतिशय कमी.आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

 

        वादळी पक्षी – पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात.त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे,पडाव समुद्रात नेत नाहीत.अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात.एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

 

         चिमण्या धुळीत लोळण्याचा खेळ खेळू लागल्या की पाउस तोंडावर आला आहे असे संकेत मिळतात.

 

 

 

मोठे प्राणी

हरीण – पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत.

 

 

वाघिण –  एका निसर्ग अभ्यासकाने सांगितलेला स्वानुभव….आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती.तिला पिल्ले होणार होती.परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला.हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात.या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते.यंदा पाऊस येणार नाही,त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही.गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत.परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही.त्यांची उपासमार होईल.याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता.वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

 

किटक:

      वाळवी – जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत.परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते.पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

 

 

      काळ्या मुंग्यां – हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार,हे समजावे.अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

 

 

 

मृग किडा : गवतावर लाल वेलवेट सारख्या मखमाली त्वचेचा किडा मृगाचा पाउस येण्याची चाहूल देतो.

 

सरपटणारे प्राणी

मगर : मगरीला ही बरेच आधी पाऊस येण्याचे संवेदन होते. मगरी ने जलाशयाच्या बाजूच्या मातीत वा वाळूत  अंडी घातल्यापासून बरोबर एकशेवीस दिवसांनी मुसळधार पाऊस येतो.  अंड्यात पिलांची वाढ होवून  त्या दिवशी मुसळधार पावसात ती पिले अंड्याच्या बाहेर पडून धो धो वाहणार्‍या पाण्याबरोबर जवळच्या जलाशयात पोहचतात.

 

बीळा मध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी.या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात.पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

 

खेकडे – तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात.तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात.हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. यावरुन खेकड्यांची समुहाने होणारे स्थलांतर नोंदले जाते.

 

झाडे :

     जंगलातील बरीच मोठी व जास्त वयांचे वृक्ष भविष्यातील अवर्षणाचे संवेदन मिळाले  की त्यांच्या खोडात पाणी साठवून ठेवतात. अवर्षण काळात त्यावरच टिकतात. तसेच येणार्‍या काळात चांगला पाऊस येण्याचे संवेदन होताच खोडातले पाणी जमिनीत सोडून देतात.

 कडूनिंबाला दरवर्षी पेक्षा जास्त लिंबोळ्या लागल्या तर तो अवर्षणाचा इशारा असतो.

 बिब्याच्या झाडाला  नेहमीपेक्षा अधिक बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.

 

 

 खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.

 

 

कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.

 

 

बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.

 

 

 

तर निसर्ग कितीतरी चांगले वाईट संकेत देत असतो. किमान आपल्या पाणी नियोजनासाठी तरी या संकेतांकडे सजगतेने पाहणे गरजेचे आहे , नाही का ?

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top